Skip to content Skip to footer

आंबेनळीतील ‘ते’ अपघातस्थळ झाले ‘आठवण पाईंट’

28 जुलै रोजी आंबेनळीतील घाटातून सुमारे आठशे फूट दरीत कोसळून झालेल्या बसच्या अपघातात 32 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. या दुर्दैवी घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. आंबेनळी घाटातील हा अपघात कायम स्मरणात राहणारा असाच होता. मात्र, यापुढे या अपघातग्रस्त ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये या सामाजिक बांधिलकीतून सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेच्या नगरसेवकाने याठिकाणाला आठवण पाईंट अशी नवी ओळख दिली आहेत. दहावीर शितोळे असे या नगरसेवकाचे नाव आहे.

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात सुमारे आठशे फूट खोल दरीत बस कोसळून तीस जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. 28 जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या आठवणी आजही काळीज पिळटवून टाकतात. या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे यासाठी विट्यातील नगरसेवक व निसर्ग वाचवा या संस्थेने अपघातस्थळाचे आठवण पॉईंट असे नामकरण करून मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. आठवण पॉईंट अशा आशयाचा फलकही घटनास्थळी लावण्यात आला आहे.
महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुटी असल्याने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी महाबळेश्वरला पिकनिकसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कृषी विद्यापीठाचीच बस त्यांनी भाड्याने घेतली होती. सर्वजण कृषी विद्यापीठातून प्रवासाला निघाले.

आंबेनळी घाटातील दाभिळ टोकाजवळ बस उजव्या बाजूला असलेल्या आठशे फूट दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 30 जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. तर एकजण बचावला होता.

एनडीआरएफ, महाबळेश्वर, पोलादपूर, खेड, महाड, दापोली येथील ट्रेकर्सचे जवान व पोलिसांनी सलग 24 तास मदतकार्य करून दरीतील मृतदेह बाहेर काढले होते. या अपघाताच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो. अपघातातील मृतांचे सर्वांना कायम स्मरण व्हावे, त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना त्या अपघाताची आठवण व्हावी.

ज्या पध्दतीने दापोलीत एकाच दिवशी 32 लोकांच्या मृत्यूचा निरोप गेला होता. तसा निरोप कोणाच्याही गावी जाऊ नये, कुणाच्याही घरात अपघाताच्या रुपाने मृत्यूला शिरकाव करता येऊ नये यासाठी आठवण पॉईंटची निर्मीती दहावीर शितोळे, नरेंद्र सावंत, दत्तात्रय शितोळे, विनोद जावीर, अविनाश पवार, शशी मेटकरी यांनी केली आहे.?

कोण आहेत दहावीर शितोळे?
दहावीर शितोळे हे सांगली जिल्ह्यातील विटा नगरपालीकेचे कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत. निसर्ग वाचवा या संस्थेच्या माध्यमातून ते निसर्ग संपदा वाचवण्यासाठी कार्यरत असतात. तसेच ते भगवा रक्षक ट्रेकर्सच्या माध्यामातून गटकोट,किल्ले स्वच्छता यासारखे उपक्रम राबवतात.

Leave a comment

0.0/5