पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्लॉग लिहीत काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. २०१४चा जनादेश ऐतिहासिक होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गैर-काँग्रेस सरकारला पूर्ण बहुमत मिळाले, असे त्यांनी लिहले आहे. देशातील घटनात्मक संस्थाचा काँग्रेसने गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदींनी म्हंटले कि, २०१४च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडले होते. विनाशाला नाही तर विकासाला निवडले, शिथिलतेला नाही तर सुरक्षेला निवडले. वोट बँकेच्या राजकारणाला बाजूला सारुन विकासाच्या राजकारणाला निवडले होते. ते पुढे म्हणाले कि, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला युपीए सरकारच्या काळात घातला गेला होता. आणीबाणी जारी करून काँग्रेसने संविधान आणि न्यायालयाचा अपमान केला आहे. तसेच काँग्रेस सरकारने सीबीआय, रॉ आणि आयबीसारख्या संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला.
एवढेच नव्हेतर युपीए सरकाराच्या काळात सीबीआय काँग्रेस ब्युरो ऑफ इन्वेस्टींगशन बनून राहिली होती. काँग्रेसने लष्कराला पैसे कमवण्याचे साधन या दृष्टीनेच बघितल्याने काँग्रेसच्या काळात सुरक्षा दलाला सन्मान मिळाला नाही. त्यांनी जीप, तोफा, रणगाडे, पाणबुडी, हेलिकॉप्टर असे अनेक घोटाळे करून त्यातून अमाप संपत्ती जमवली असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या काळात सुरक्षा दलाने धाडसाने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, जवानांच्या धाडसाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुरावे मागून काँग्रेस त्यांचे मनोबल खच्ची करत आहे, असे टीकास्त्र मोदींनी ब्लॉगद्वारे काँग्रेसवर डागले.