राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास कोविंद यांना भाजप १२२, शिवसेना ६३ आणि त्यात अपक्ष १३ अशी एकूण १९८ मते मिळणे अपेक्षित होते. पण कोविंद यांना एकूण २०८ मते मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली आहेत. मतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोविंद यांना १० मते अधिक मिळाली आहेत. आता ही १० मते नक्की कोणती? ती मते काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.