Skip to content Skip to footer

राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधानांनी हवाई दलाचे पैसे चोरले

वृत्तसंस्था

रांची : ज्या हवाईदलाचे वैमानिक देशाच्या सुरक्षेसाठी जिवाची बाजी लावतात, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच हवाईदलाच्या वाट्यातील पैसे चोरून उद्योगपती अनिल अंबानींना दिले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कधी या सरकारसाठी लोक “अच्छे दिन आयेंगे’ अशा घोषणा देत होते, आता मात्र परिस्थिती बदलली असून चौकीदार चोर है, अशा घोषणा दिल्या जात आहेत, असे राहुल म्हणाले.

रांची येथील मोरहाबादी मैदानावर आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, की केवळ हवाईदलच नाही तर शेतकरी आणि आदिवासींच्या कोट्यातील पैसेही पंतप्रधान चोरतात. शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनीच्या संरक्षणासाठी कॉंग्रेसने 2013 मध्ये जमीन अधिग्रहण कायदा आणला होता, मात्र झारखंडमध्ये त्यांचीच जमीन बळकावून उद्योगपतींना देण्यात आली. पाणी, जंगल आणि जमीन ही शेतकऱ्यांची आहे, अंबानी-अडानी यांची नाही.

पंतप्रधान मोदी जेथे जेथे जातात, तेथे शत्रुत्व निर्माण करतात, तर कॉंग्रेसचे काम शत्रुत्व मिटवण्याचे आणि लोकांना जोडण्याचे आहे. भाषणात आम्ही कधीही खोटे बोललो नाही, मात्र, पंतप्रधानांच्या भाषणात सत्य काहीच नसते. त्यांना दोन भारत तयार करायचे आहेत. एक अनिल अंबानींसाठी आणि दुसरा गरिबांसाठी. आम्ही असे होऊ देणार नाही, असे राहुल म्हणाले.

Leave a comment

0.0/5