मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सोशल मिडियावरुन बदनामी करण्यात आली होती. त्याच बदनामी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर घेतले होते. ‘प्रकरण न्यायप्रविष्ट असताना यासंदर्भात कोणतेही आक्षेपार्ह ट्विट न करण्याची तुमच्या आशिलाना समज द्या’, अशा शब्दांत हायकोर्टाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना सुनावले आहे.
नवी मुंबईतील रहिवासी सुनैना होली यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह व बदनामी करणारे व्यंगचित्र अपलोड केले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
ऍड.अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत एफआयआर रद्द करण्यात यावे तसेच अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, सरकारच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ काऊन्सिल मनोज मोहिते तसेच सरकारी वकील जयेश याग्निक यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला किमान खटला निकाली निघत नाही तोपर्यंत तरी याबाबत सोशल मीडियावर ट्विट करण्यापासून याचिकाकर्त्याना रोखावे अशी मागणी केली.