करोनाला आपल्याला पूर्णपणे हद्दपार करायचे आहे आणि त्यासाठी स्वतःच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षामध्ये करूया असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम जनतेला नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेले वर्षभर संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी करोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
करोना संसर्गामुळे एक नवी जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यात मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग केला जात आहे. अशावेळी पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला, पण करोना विषाणूच्या बदलत्या रूपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे असे म्हणत सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.