भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे.
तसेच या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब यांनी सरकारी, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना मंत्री मलिक म्हणाले की, ज्या प्रकारे आग लागल्यामुळे १० बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. असे मलिक यांनी बोलून दाखविले.