राज्यात एकीकडे कोरोना लसीकरण सुरु झालेले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.
त्यात अहमदनगर जिल्हयातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्याला ताप आल्यानंतर तपासणी केली असता कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर घरातील इतर कुटुंबाची चाचणी केली असता इतर १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.