भीमशक्ती विचार मंच आणि माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या वतीने संभाजीनगरात आयोजित ‘जय भीम फेस्टिव्हल’मध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी सत्तेत असलेल्या मोदी सरकार आणि राज्यात विरोधात बसलेल्या फडणवीसांवर टीकेचा जोरदार मारा केला होता.
मागच्या सात वर्षांपासून सरकारच्या विरोधी विचारांना संपवण्याचे काम देशात राबवण्यात येत आहे. संस्था आणि व्यक्तीस्वातंत्र्य संपवण्याचे षडयंत्र दिसत आहे. देशातील जनता शांत दिसत असली तरी आतून खदखद वाढली आहे. २०२४ मध्ये शांततेचा स्फोट झालेला दिसेल.
सद्दाम हुसेन, हिटलर, डोनाल्ड ट्रम्प असे कुणीच नेते सत्तेचा अमरपट्टा बांधून आले नव्हते. नेत्याच्या वर्तनातून दंभ दिसतो तेव्हा इतिहास बदलतो, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी आपल्या रविवारी झालेल्या मुलाखतीत केली आहे.