Skip to content Skip to footer

गटारात का उतरला भाऊ कदम?

काही माणसं खरोखर नशीबवान असतात. त्यांना जराही घाम न गाळता सुख आणि ऐश्वर्य भोगता येतं. पण पडद्यावर ‘नशीबवान’ माणसाची भूमिका साकारणाऱ्या भाऊ कदमचं मात्र तसं नाही. चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य न्याय मिळावा याकरता भाऊ कदम ने प्रचंड मेहनत घेतली.

 

‘या’ सिनेमात साकारली भूमिका

एखादा चित्रपट यशस्वी करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेत असतात. एखाद्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आव्हान स्वीकारत कुठल्याही प्रकारचं काम करण्यास ते तयार असतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे भाऊ कदम… ‘नशीबवान’ या आगामी मराठी चित्रपटासाठी भाऊने क्लेषदायक कामही हसतमुखाने केलं आहे. या चित्रपटामध्ये भाऊने सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे.

 

म्हणून उचलला कचरा

ही भूमिका खरी वाटावी, म्हणून भाऊने खरोखरच कचरा उचलून साफसफाई केली आहे. यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितला. तसंच सार्वजनिक स्वछतागृहाची सफाईदेखील करायला लावली. या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण मुलुंड परिसरात झालं आहे.

रस्त्याने जाताना आपल्या बाजूने जरी कचरागाडी गेली तरी आपण लगेच नाकाला रुमाल लावतो, पण भाऊने त्या गाडीवर चढून आणि गाडीत बसून ही भूमिका साकारली आहे. गटारात बसून झाडू बांधली आहे. नाकाला रुमाल बांधून दोन चाळींमधील अरुंद गटार साफ करताना ‘ए वरून कचरा टाकू नका’, असा आवाजही लोकांना दिला आहे. कचऱ्यासाठी वापरली जाणारी ढकलगाडीही ढकलली आहे.

व्यक्तिरेखेला दिला न्याय

हे सर्व आपण चित्रपटातील व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी केल्याने कुठल्याही प्रकारची लाज न वाटता आपण केलेलं काम लोकांना आवडेल, असा विश्वास वाटत असल्याचं सांगत भाऊ म्हणाला, या चित्रपटाच्या निमित्ताने मी सफाई कामगाराच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या, त्यांना होणारे आजार, समाजाकडून त्याची होणारी हेटाळणी हे सर्व बघताना स्वतःचा तिरस्कार वाटायला लागला.

कारण आपण निरोगी आरोग्य जगावं, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा, यासाठी हे लोक घाणीमध्ये काम करतात, आपला कचरा उचलतात. खरंच खूप ग्रेट आहेत हे लोक. रात्रंदिवस झटणारे हे कामगार माझ्यासाठी खरे हिरो ठरले आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल शब्दांत व्यक्त होऊ न शकणारा आदर निर्माण झाला.

‘नशीबवान’ हा चित्रपट उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत आहे. ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केलं आहे.

Leave a comment

0.0/5