Skip to content Skip to footer

इम्रान खान च्या नेतृत्वाखाली नवा पाकिस्तान घडेल काय?

इस्लामाबाद : जनतेला नव्या पाकिस्तानचे स्वप्न दाखवणाऱ्या इम्रान खान यांना खरोखरच आपल्या देशात बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी पाकिस्तानचे दहशतवादी ‘ चरित्र ‘ बदलावे लागेल , पराकोटीचा हिंदुस्थानद्वेष सोडावा लागेल , कश्मीरातील अतिरेक्यांची घुसखोरी थांबवावी लागेल , पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे , तोयबा – जैश – तालिबानचा इस्लामी दहशतवाद नष्ट करावा लागेल . अर्थात पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी लिहिलेल्या पटकथेनुसार पंतप्रधान होण्यासाठी निघालेल्या ‘ गूलछबू ‘ इम्रान खान यांना असा नवा पाकिस्तान घडवता येईल काय ?

इच्छा असो वा नसो, पण पाकिस्तानातील घडामोडींची दखल आपल्याला घ्यावीच लागते. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये बहुचर्चित सार्वत्रिक निवडणूक पार पडली. अपेक्षेप्रमाणे यावेळी रक्तरंजित मतदान झाले. त्याचे बहुतांश निकालही आता समोर आले आहेत. या निवडणुका किती स्वच्छ वातावरणात झाल्या आणि एखाद्या पटकथेबरहुकूम त्या कशा राबवल्या गेल्या हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पाकिस्तानचे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळय़ात पाकिस्तानी जनतेने विजयाची माळ घातली आहे. राजकारणात यशस्वी होण्याचे आणि एक ना एक दिवस पाकिस्तानचा पंतप्रधान बनण्याचे इम्रान खान यांचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्णत्वास गेले आहे. पाकिस्तानी जनतेला नव्या पाकिस्तानचे म्हणजेच एका अर्थाने पाकिस्तानच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून इम्रान खान यांनी या निवडणुका जिंकल्या खऱ्या; पण हे ‘अच्छे दिन’चे हाडूक कसे गळय़ात अडकते हे इम्रानला सत्तेच्या त्या काटेरी खुर्चीवर बसल्यावरच कळेल. आपल्याकडे जसा राजकारणासाठी पाकिस्तानचा ‘वापर’ केला जातो तोच कित्ता पाकिस्तानी राजकारणीही गिरवत असतात हे या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसले. नवाज शरीफ यांनी हिंदुस्थानात कशी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ते मोदी यांचे कसे मित्र आहेत असा प्रचार इम्रान खान यांनी केला तर ‘प्ले बॉय’ अशी इमेज असलेल्या इम्रानची मुले हिंदुस्थानसह अनेक देशांत खेळत आहेत असा हल्ला त्यांच्या विरोधकांनीही चढवला.

त्यांच्या तीन-तीन लग्नांची कहाणीही रंगवून सांगितली गेली. माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी यांचे मोठे आव्हान इम्रान खानसमोर होते, मात्र या दोन्ही पॉवरफुल घराण्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध देशभर रान उठवून इम्रान यांनी आपल्या प्रचारसभांतून पाकिस्तानी जनतेला स्वच्छ कारभाराची हमी दिली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आधीच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना पायउतार केले होते. सत्तेचे पद गेले की जिवाच्या भीतीने पाकिस्तानी नेते देशाबाहेर आश्रय घेतात हा इतिहास आहे. त्यानुसार न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर नवाज शरीफ लंडन येथे कुटुंबीयांसह विजनवासात होते. कॅन्सरने पीडित असलेल्या पत्नीची सेवा करत होते. मात्र निवडणुकीत जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पत्नीला बेशुद्धावस्थेत सोडून शरीफ आपली कन्या मरियमसह पाकिस्तानात परतले. पाकिस्तानात पाय ठेवताच आपल्याला अटक होणार हे पक्के ठाऊक असतानाही शरीफ यांनी हे पाऊल उचलले. विमानातून उतरण्यापूर्वीच त्यांना अटक झाली. ऐन निवडणुकीत घडलेले हे नाटय़ रंगेल आणि शरीफ यांच्या पक्षाला याचा मोठा फायदा होईल असे सर्वांनाच वाटत होते, पण तसे घडले नाही. विजयाची माळ इम्रान खान यांच्याच गळय़ात पडावी असा चंग खुद्द पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआयनेच बांधलेला असल्यामुळे शरीफ यांची कोणतीही मात्रा चालली नाही.

इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी हा पक्ष बहुमताच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. २७२ सदस्य संख्या असलेल्या नॅशनल असेंब्ली या पाकिस्तानी संसदेत बहुमताचा १३७ हा जादुई आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. मात्र १२० च्या आसपास जागा जिंकून इम्रान खान हेच पंतप्रधानपदाच्या खुर्चीच्या सर्वात जवळ पोहोचले आहेत. जेमतेम १७ जागांची तजवीज इम्रान यांना करावी लागेल. सध्या सत्तेवर असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग या नवाज शरीफ यांच्या पक्षाला जेमतेम ६४ जागा मिळाल्या, तर माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष ४३ जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इतर लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मिळून ५० ते ५५ जागा काबीज केल्या आहेत. जनतेला नव्या पाकिस्तानचे स्वप्न दाखवणाऱ्या इम्रान खान यांना खरोखरच आपल्या देशात बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी पाकिस्तानचे दहशतवादी ‘चरित्र’ बदलावे लागेल, पराकोटीचा हिंदुस्थानद्वेष सोडावा लागेल, कश्मीरातील अतिरेक्यांची घुसखोरी थांबवावी लागेल, पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे, तोयबा-जैश-तालिबानचा इस्लामी दहशतवाद नष्ट करावा लागेल. अर्थात पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी लिहिलेल्या पटकथेनुसार पंतप्रधान होण्यासाठी निघालेल्या ‘गूलछबू’ इम्रान खान यांना असा नवा पाकिस्तान घडवता येईल काय?

Leave a comment

0.0/5