Skip to content Skip to footer

कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये होणार ‘झिरो पेंडन्सी’

पुणे: कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये ‘झिरो पेंडन्सी ॲण्ड डेली डिस्पोजल’ अभियानाची प्रभावीपणे करावी.

या अभियानची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज (शुक्रवार) दिल्या.

येथील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल आणि प्रतिबंधक कारवाई या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत श्री. चंद्रकांत दळवी बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कविता व्दिवेदी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांच्यासह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले, जनतेला चांगले प्रशासन देण्याचे आपले काम आहे. चांगले प्रशासन असेल तर सर्व प्रश्न मिटतात. विकासकामांना गती मिळते. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत, या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी वेळेत कामांचा निपटारा झाला पाहिजे.

वर्षानुवर्षे जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. ती तातडीने मार्गी लावली पाहिजेत.

झिरो पेंडन्सी राबविण्यासाठी कामाचे टप्पे करणे महत्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्चित करुन त्या सर्व प्रकरणांचा निपटारा करावा. त्यासाठी सिक्स बंडल पध्दत, लिपीक दप्तरातील नोंदवही अद्ययावत करणे, ए.बी.सी.आणि डी. पध्दतीची यादी तयार करणे, अभिलेख कक्ष आदर्श करणे या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना श्री. दळवी यांनी दिल्या.

पोलिस विभागात झिरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कोणत्याही विभागाचा अभिलेख कक्ष हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो स्वच्छ आणि अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. यामुळे प्रशासनाच्या बाबतीत जनतेच्या मनात सकारात्मकता वाढेल आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

हे अभियान राबविताना प्रत्येक पोलिस स्टेशनच्या आवारात असणाऱ्या अपघातातील, जप्त केलेल्या तसेच बेवारस मोटर सायकल, चारचाकी गाड्यांचीही योग्य प्रकारे विहित वेळेत विल्हेवाट लावण्यावर भर द्यावा. तसेच अने‍क करणाने नाहरकत दाखले, परवानगीचे दाखलेही वेळेत देण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

प्रास्ताविकात विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, झिरो पेंन्डसीचा चांगला परिणाम महसूल विभागात दिसत आहे. त्याच प्रमाणे पोलिस विभागातही हा उपक्रम राबविण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. झिरो पेंन्डसीमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांतही कामचा आत्मविश्वास वाढतो. या उपक्रमाची अंमलबाजावणी अत्यंत काटेकोरपणे करून पोलिस प्रशासन अधिक लोकाभिमूख व गतीमान करण्यावर आम्ही भर देणार आहे.

कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तडीपारी प्रस्तावावर मार्गदर्शन केले, कविता व्दिवेदी यांनी तडीपार प्रस्तावामधील अपील सुनावणीमध्ये जाणाऱ्या त्रुटींबाबत मार्गदर्शन केले. तर पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सुत्रसंचालन पोलिस उपाधिक्षक (गृह) बरकत मुजावर यांनी केले. आभार पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी मानले. या कार्यशाळेला कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस अधिक्षक, विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधिक्षक, उपाधिक्षक तसेच सर्व पोलिस ठाण्यांचे प्रमुख, पोलिस कॉन्सटेबल उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5