आज लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत, देशासह महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना दणदणीत विजय मिळताना दिसत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव झाला आहे. पार्थ यांच्या पराभवाने पवार घराण्याची विजयी होण्याची ५० वर्षांची परंपरा मोडली आहे.दरम्यान,राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर पडले. ही पिछाडी त्यांना भरून काढता आली नाही. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पार्थ ज्या जागेवरून लढत होता, ती जागा आमची नव्हतीच. मागील दोन निवडणुकांत त्या जागेवर आमचा पराभव झाला होता. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी आम्ही पार्थला उभे करून प्रयोग करून बघितला,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. हा मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे तगडे वजन आहे. तसे पार्थ यांनी या मतदार संघात उभे न रहाण्याचा सल्ला सुद्धा शरद पवारांनी दिलेला होता. परंतु अजित पवारच्या हट्टापाई पार्थ यांना तिकीट देण्यात आलेली होती.