काश्मीर मुद्धावरून पुन्हा एकदा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केलेली आहे. जम्मू-काश्मीरचा आज एकतृतीयांश भाग जो भारताकडे नाही आहे त्याला जबाबदार कोण असा सावल शहा यांनी उपस्थित केलेला आहे. ते शुक्रवारी राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काश्मीर मुद्द्यावरून माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.
जवाहरलाल नेहरू यांनीच काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस नेहमी आम्ही काश्मीरमधील जनतेला विश्वासात घेत नाही, अशी टीका करते. मात्र, हा निर्णय घेताना त्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांनाही विश्वासात घेतले नाही. त्यावेळी शस्त्रसंधीचा निर्णय कोणी घेतला, हे एकदा तपासून पाहावे. त्यामुळे काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवण्याच्या फंदात पडू नये, असा टोला सुद्धा काँग्रेस पक्षाला लगावला होता.