Skip to content Skip to footer

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘ लढाईत जिंकली मात्र तहात हारली.

Milk Strike in Maharashtraगेल्या ४ दिवसांपासून दूध दरवाढीचं सुरु असलेलं आंदोलन सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत राजू शेट्टींचा विचार न घेता संपुष्टात आलं. दूध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीचा प्रश्न लावून धरला होता त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक तरी प्रतिनिधी हजर असता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जी बैठक पार पडली. त्या बैठकीला बहूतेक सर्व पक्षाचे नेते हजर होते. मात्र स्वाभिमानीचा एकही प्रतिनिधी अथवा नेता या बैठकीला हजर नसल्याचे समजते. स्वाभिमानीचे सर्व नेते आज आंदोलन चांगलंच तापलेलं असल्यामुळे आपल्या मागण्या मान्य होतील, या अविर्भावात होते. त्यातच विधानसभा अध्यक्षाच्या दालनात झालेल्या बैठकीत दूधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि २१ जुलैपासून हा नवा दर लागू करण्‍यात येणार आहे. याची घोषणा राज्याच्या दोनही सभागृहात केली.

दरम्यान माध्यमांना सांगितल्या प्रमाणे सर्व माध्यमांनी ‘राजू शेट्टींच्या आंदोलनाला मोठं यश’ अशा बातम्या देऊन राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाची हवाच काढून घेतली. कारण राजू शेट्टी यांची जी मूळं मागणी होती ती मागणी कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांना मान्य होणारी नव्हती. कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ५ रुपये अनुदान जमा करणे म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:च्या गडाला आग लावण्यासारखे आहे.

त्यातच राज्यात सर्वात जास्त खाजगी किंवा सहकारी दूध संघ हे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. आणि ५ रुपये जर फडणवीस सरकारने त्यांच्या ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणं सुरु केलं असतं तर या उभय मंडळीचे संस्थानं खालसा झाली असती, म्हणून हा निर्णय सत्ताधारी तसंच विरोधकांना परवडण्यासारखा नसल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांनी राजू शेट्टी यांना बाजूला ठेवत दरवाढीची घोषणा केली आणि आपल्याला हवं ते आपल्या पदरात पाडून घेतलं.

दरम्यान माध्यमात आलेल्या बातम्यानंतर राजू शेट्टी यांना याची जाणीव झाली होती की सरकारने आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारली आहे. त्यामुळे आता शेतकरी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत. कदाचित अशी भीती राजू शेट्टी यांना वाटल्याने त्यांनी डायरेक्ट नागपूर गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र राजू शेट्टी यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकारण्यावर आंदोलन ऐन भरात असताना आंदोलन मागे घेण्याची वेळ आली.आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसटला. आणि ‘स्वाभिमानी’ लढाईत जिंकली मात्र तहात हारली.

Leave a comment

0.0/5