कारंजा लाड (वाशिम) – कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला स्वतंत्र जागा अद्याप उपलब्ध झाली नाही. परिणामी, डाक कार्यालयाचा कारभार हा भाड्याच्या इमारतीतच चालत असून स्वतंत्र जागा केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीय आहे.
कारंजा शहरात साधारणत: ५० वर्षांपूर्वी डाक कार्यालयाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ५० वर्षातही या विभागाला स्वतंत्र जागा व इमारत मिळू शकली नाही. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी डाक विभागाने आपले कार्यालय थाटले आहे. चार, पाच वर्षातच कार्यालयाचे ठिकाण बदलत असल्याने नागरिकांचीदेखील गैरसोय होते.
शासनाकडून शासकीय कार्यालयांसाठी जागा आरक्षीत केली जाते. त्यानुसार कारंजा नगर पालिकेने दिल्ली वेशीच्या बाहेर पोस्टासाठी जागा आरक्षीत केली होती. परंतू, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पोस्टाच्या जागेसाठी भंटकती सुरू आहे. कारंजा शहरात केंद्र शासनाचे दोन्ही उपक्रम रेल्वे आणि डाक विभाग उपेक्षीत असल्याचे दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधी व केंद्र शासनाचे लक्ष देण्याची गरज आहे. कारंजा शहराच्या सभोवताल शासकीय भुखंड मोठया प्रमाणात आहेत. कोणत्याही भुखंडावर ही ईमारत उभी राहु शकते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची अपेक्षा शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.
खोली खाली करण्यासाठी पत्रव्यवहार
भाडेच्या जागेत असलेले डाक कार्यालय त्वरित खाली करण्यात यावे, यासंदर्भात घरमालकाने डाक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे डाक विभागाला पुन्हा एकदा भाडेतत्वावर दुसºया इमारतीचा शोध घ्यावा लागणार आहे. डाक कार्यालयाची जागा वारंवार बदलत असल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अपुरे कर्मचारी असल्यानेदेखील नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याचे दिसून येते.