काल कल्याण येथे मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढलं. अभाविपच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना युवासेनेने चांगलाच चोप दिला. मुंबई विद्यापीठाच्या या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित असताना हुल्लडबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा अभाविपचा स्टंट युवासेनेने हाणून पाडला.
याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई विद्यापीठाने कायदेशीर मार्गाने या कार्यक्रमास युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलेलं होतं. यास अभाविपने विरोध दर्शवला होता. मागील वर्षी झालेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेने अभाविपचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेंव्हापासून अभाविप युवासेनेचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात नाहक खोडा घालून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसते. सदर विद्यापीठ उपकेंद्र हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली १० सिनेट सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कार्यान्वित झालं आहे. असं असतानाही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे लोकप्रतिनिधी नसून राजकीय नेते आहेत असं कारण देत अभाविपने त्यांना या कार्यक्रमास निमंत्रण देण्यास विरोध केला. हा विरोध न जुमानता मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आदित्य ठाकरे यांना उदघाटक म्हणून आमंत्रित केलं.
हा कार्यक्रम पार पडत असतानाच विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या भाषणावेळी अभाविपने घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाचे सर्वोच्च पदस्थ असणारे कुलगुरू बोलत असताना आणि युवासेनाप्रमुखांच्या उपस्थित केलेली ही घोषणाबाजी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना अजिबात रुचली नाही. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अभाविपच्या कार्यकर्त्यांना चोप दिला आणि सभागृहाबाहेर काढलं. दरम्यान पोलिसांनी अभाविपच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कालांतराने त्यांना सोडून देण्यात आलं.
आदित्य ठाकरे यांच्यासारख्या चांगल्या प्रतिमेच्या नेत्यास नाहक विरोध केल्याने तसंच कुलगुरूंच्या उपस्थितीचे भान न ठेवता हुल्लडबाजी केल्याने युवासेना आक्रमक झाल्याचं समजतं.
डावी आणि उजवी विचारसरणी येत्या काळात अस्तित्वात राहणार नाही–आदित्य ठाकरे