नेत्यांचा वापर करून त्यांचे पंख छाटण काँग्रेस-राष्ट्रवादीला भोवलं
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या अगोदरच लोकसभा निवडणुकीदरम्यान विखे-पाटील, मोहिते-पाटील अशा मातब्बर नेत्यांनी काँग्रेस/राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता तर जयदत्त क्षीरसागर या ओबीसींच्या हेवीवेट नेत्याने लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यापैकी जयदत्त क्षीरसागर, राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळालं. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेतेच शिवसेना भाजपमध्ये जाऊन पुन्हा महाराष्ट्रावर राज्य करत आहेत आणि ते केवळ सत्तेसाठी पक्ष बदलत आहेत अशी टीका होत आहे मात्र यामागे असलेली पार्श्वभूमी वेगळीच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच मुळात “फोडा आणि राज्य करा” तसेच “वापरा आणि फेकून द्या” या दोन धोरणांनुसार कार्यशैली असलेला पक्ष आहे हे राष्ट्रवादीच्या इतिहासावरून सहज लक्षात येऊ शकतं. मंडल आयोगावेळी शिवसेनेतील मातब्बर ओबीसी नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने फोडले. जोपर्यंत ओबीसी नेते म्हणून त्यांच्या फायदा राष्ट्रवादीला झाला तोपर्यंत छगन भुजबळांना पदे आणि मान मिळाला परंतु त्यांना मर्यादित ठेवलं गेलं. भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर त्यांची झालेली अवस्था महाराष्ट्राने पाहिली आहेच. विशेष म्हणजे तेंव्हा राष्ट्रवादीने त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही.
अकलूजच्या मोहिते पाटलांचा सुद्धा राष्ट्रवादीने प्रचंड फायदा करून घेतला. परंतु शेवटी त्यांनाही अडगळीत टाकलं. मोहिते-पाटील केवळ अकलूजपुरते मर्यादित राहिले. बीडचे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार आणि मातब्बर ओबीसी नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचाही ओबीसी चेहरा म्हणून राष्ट्रवादीने वापर करून घेतला. जयदत्त क्षीरसागर यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रभर असताना त्यांना केवळ बीड मतदारसंघापुरतं मर्यादित ठेवलं. या काही उदाहरणांवरून या नेत्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण लक्षात येतं.
राष्ट्रवादीने आपला वापर करून घेतला.सत्ता असताना मंत्रिपदही दिलं,पण आपल्याला जिल्ह्याबाहेर वाढू दिलं नाही. सत्ता जाताच मंत्रिपद गेलं आणि त्याबरोबर मिळणारा मानसन्मानही गेला ही अपमानाची भावना राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांमध्ये गेली अनेक वर्षे होती. सध्या शिवसेना-भाजपची सत्ता असल्याने आपल्याला न्याय मिळेल आणि जिथे शिवसेना-भाजपचा प्रभाव कमी आहे तिथला नेता म्हणून प्रवेश जर शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास आपल्याला संघटनेच्या पातळीवर नेतृत्व करण्याची संधी सुद्धा मिळेल अशी या नेत्यांची अपेक्षा आहे त्यामुळे हे नेते सध्या शिवसेना भाजपमध्ये दाखल होत आहेत.
एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादीला नेत्यांचा मतांसाठी वापर करून घेणं आणि नंतर त्यांचेब पंख छाटणं त्यांना भोवल असल्याचं बोललं जात आहे.
जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन शिवसेनेने केला ओबीसी समाजाचा सन्मान