राज्यातील ३३ जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार जनावरांना लम्पी चर्मरोगाची बाधा झाली होती. मात्र वेगाने १०० टक्के लसीकरण झाल्याने पशुधनाच्या मृत्यूदरावर नियंत्रण राखता आले, तसेच सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून ही लस आता राज्यातच तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केलेल्या लम्पी चर्मरोगाविषयी प्रश्नावरील उत्तरात मंत्री विखे-पाटील यांनी वरल माहीती दिली. विखे-पाटील यांनी पुढे सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लम्पी आजार बळावला होता.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. शासनाने १०० टक्के लसीकरण वेगानं केल्यामुळे पशुधनाचा मृत्यू नियंत्रणात राहिला.
राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनेही स्वीकारून आता पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
विमा योजना विचाराधीन
मृत गायीसाठी ३० हजार, बैल २५ हजार आणि वासराला १६ हजारांच्या देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई वाढवण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. त्याप्रमाणे पशुधनाला नेहमीच अनेक रोगांचा समना करावा लागतो त्यामुळे पशुधनाची मोठ्याप्रमाणावर हानी होते. त्यात लाखो रुपयांचे नुकसान होते. दगावलेल्या पशुधनासाठी पशुपालकाला कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचेही विचाराधीन असल्याचे श्री. विखे पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.